दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञानाचा महामार्ग तयार करा प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे

सत्ताधाऱ्यांना कोपरखळी

Jun 8, 2026 - 16:33
 0  3
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञानाचा महामार्ग तयार करा   प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञानाचा महामार्ग तयार करा   प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे

 जयसिंगपूर : प्रतिनिधी -

       एका देवळापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करून महामार्ग तयार करीत आहात आणि त्याला शक्तीपीठ महामार्ग असे संबोधन केले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलाने हस्तगत करून सत्ताधारी हे करीत आहेत मात्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी कसलाच मार्ग नाही. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ज्ञानाचा महामार्ग तयार करावा या मागणीची कोपरखळी प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याच्या सत्ताधाऱ्यांना मारली. येथील जयसिंगपूर महाविद्यालय आवारातील डॉ. शिर्डी सभागृहात तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनात डॉ कांबळे बोलत होते. रविवारी दिनांक सात रोजी संपूर्ण दिवसभरात साहित्य संस्कृतीची जतन जोपासना आणि संवर्धन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्थेने आयोजित केलेल्या नांगरट साहित्य संमेलनात प्रथम परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे होते. दुसऱ्या सत्रात शेतकऱ्यांचा आसूडानंतरच्या आज पर्यंतच्या शेतकरी चळवळी या विषयावर प्रथम परिसंवाद संपन्न झाला. 

 साहित्यिक प्रवीण बांदेकर, डॉ. महेंद्र कदम आणि प्रसाद कुलकर्णी या ज्येष्ठ साहित्यिकांनी हा परिसंवाद गाजवला. साहित्य संस्कृतीची जोपासना करीत देशातील पहिली कृषी चळवळ सुरू करणारे कांतीबा जोतिराव फुले यांना समर्पित असे हे सर्व कश पातळीवरील सर्वोच्च दर्जाचे नांगरट साहित्य संमेलन असून शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी गेल्या आणि शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून रडणे आणि आत्महत्या करण्यापेक्षा लढले पाहिजे असा संदेश सर्व परिसंवादकांनी दिला.

 या परिसंवादाचे संयोजन डॉ महावीर अकोळे यांनी केले. त्यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परिसंवादाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा किसनराव कुराडे उपस्थित होते. आभार विशाल चौगुले यांनी मानले. 

आजच्या युगातील सत्ताधार्यांनी व्यवस्थेची केलेली विसंगत अवस्था असून फुले शाहू आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या सुखासाठी मांडलेले विचार ही चळवळ पुढे नेऊ शकतात. आणि त्याच विचारांची वारंवार पेरणी करून ही चळवळ पुढे न्यावी लागेल असा मौलिक सल्लाही यावेळी प्रा गौतमीपुत्र कांबळे यांनी दिला. आणि त्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळावा अशी अपेक्षा या परिसंवादात बोलताना प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तर अशा माध्यमातून आपण आत्मचिंतन करायलाच पाहिजे तरच ही चळवळ पुढे जाईल असेही ते म्हणाले. शेती हे देशाचे मूळ वैभव आहे हे समजून घेतले पाहिजे आणि नव्या पिढीला असे संस्कार ही दिले पाहिजेत अशी अपेक्षा यावेळी डॉ महेंद्र कदम यांनी व्यक्त केली. एकूणच पुन्हा पुन्हा नांगरट करून शेतकरी चळवळीच्या विचारांची पेरणी करण्याचा निश्चय या संमेलनात करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0