कृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

May 7, 2026 - 16:19
May 7, 2026 - 16:20
 0  5
कृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर
कृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर : प्रतिनिधी

शेतकरी सक्षम झाला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. त्यामुळे कृषी विभागाने शासनाच्या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात. खरीप हंगामात बियाणे, खत किंवा औषधांची टंचाई निर्माण होणार नाही याची अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश माजी आरोग्य राज्यमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले. जयसिंगपूर येथील स्व. शामराव पाटील यड्रावकर सभागृहात आयोजित शिरोळ तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी त्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यांत्रिकीकरणाचा वापर करून उत्पादन खर्च कमी व उत्पन्न वाढविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. बदलत्या हवामानाचा विचार करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवून कृषी विभागाने अधिक गतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शिरोळ तालुक्यातील खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगाम नियोजन व आढावा सभा जयसिंगपूर येथील स्व. शामराव पाटील यड्रावकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. 

सभेच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांनी खरीप हंगामाचे सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये बियाण्यांचा पुरवठा, खतांचे नियोजन, पीक पद्धती, शासनाच्या विविध कृषी योजना तसेच आगामी उपक्रमांची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विभाग सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. शांतिकुमार पाटील यांनी ‘शेतीतील आव्हाने आणि व्यावसायिक दृष्टिकोन’ या विषयावर मार्गदर्शन केले. बदलते हवामान, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील स्पर्धा यांचा विचार करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी नियोजनबद्ध शेती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेदरम्यान कृषी विभागामार्फत आधुनिक शेती अवजारे, तंत्रज्ञान आणि विविध कृषी साधनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कृषी कर्मचारी तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना शेती यंत्रांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी समाजकल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, पंचायत समिती सदस्य प्रवीण देसाई, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सादरीकरण चंद्रकांत जांगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0